Sunday 20 November 2011

" स्वान्त सुखाय ! "



लिहिणे मनापासून आवडते व आवडीच्या कामासाठी वेळ काढला जातो तसे, वेळ कमी मिळत असला तरी आज खूप दिवसांनी वेळ मिळाला.
एक प्रश्न आहे कि हे सर्व, म्हणजे लेखन,  आपण का करतो ? काही  काम नाही म्हणून ? कि प्रसिद्धीसाठी ? कि अजून काही कारण आहे ? नेमके एक उत्तर देणे कठीण आहे. माझ्या दृष्टीने  "स्वान्त  सुखाय"  हेच उत्तर आहे. स्वतःच्या सुखासाठी. स्वतःच्या  आत्मिक समाधानासाठी हि सर्व धडपड. कोणी वाचो अथवा न वाचो; कोणी तारीफ करो अथवा न करो. स्वतःला मिळणारे आत्मिक समाधान हे अधिक महत्वाचे.  अर्थातच चार लोकांनी वाचून त्यावर प्रतिक्रिया दिली तर आपण सुखावतो व अधिक प्रोत्साहित होतो.
आपण आपल्या व्यवसायात, नौकरीत अथवा धंद्यात इतके व्यस्त असतो कि आपल्याला कोणत्याही नवीन कामासाठी वेळच नसतो. त्यात आर्थिक दृष्टीने बघण्याची सवय असल्याने नवीन कामाचा फायदा काय, असा प्रश्न पडतो. आर्थिक दृष्ट्या फायदेशीर नसेल  तर तो पर्याय बाद.  या सवयीमुळे आपण स्वतःची प्रगती होऊ देत नाही. हेही खरे कि आज तोच यशस्वी मानला जातो जो जास्त पैसा कमावतो.  आपण केवळ पैसा कमावण्यासाठी जीवन व्यतीत करतो का ? पैश्या पलीकडेही आपल्या जीवनाला काही  अर्थ, उद्देश आहे.  तो पलीकडचा उद्देश काय आहे ?
दिवस उगवला, कि तो समाधानकारकरीत्या साजरा करायचा.  आपण सुटीच्या दिवसाचा विचार करू कारण इतर दिवशी आपण खूप busy असल्याने वेळच नसतो. रविवार (सुटीचा दिवस) आपण कसा घालवतो ?
अ) इतकी  ( घरातील ) कामे रांगेत असतात  (उदा. पंखे साफ करणे, जळमटे पुसणे, इत्यादी )  कि  दिवस कसा घालवायचा हा choice नाही.
ब) सकाळी चहाच्या वेळी होम मिनिस्टर सांगतील त्याप्रमाणे ( प्रदर्शन पाहायला जाणे, सिनेमाला जाणे इत्यादि ) दिवस साजरा करणे.
क) रविवार आला कि  जाम tension येते काही लोकांना. आता करायचे तरी काय. त्यापेक्षा Office परवडले.
ड) ठरवून रविवार enjoy केला जातो काही तरी वेगळे करून. कधी पिकनिक, तर  कधी friends reunion , तर  कधी जुने फोटो अल्बम पाहणे, तर कधी अजून काही. (enjoyment कधी कधी unplanned सुद्धा असू शकते ).
तुमचे तुम्हीच ठरवा कि तुम्ही अ), ब), क) का  ड)  वर्गात बसता ते.
हे झाले छोट्या सुटीचे. 
आता थोडा लांबचा विचार करू.  Retired झाल्यानंतर काय करायचे याचा कधी विचार केला का ? कदाचित तुम्ही म्हणाल, त्याचा विचार आत्ता कशाला ? अजून वेळ आहे. त्यावेळी बघून घेऊ.
आपल्याकडे अशी विचार करण्याची पद्धत आहे कि साठ वर्षे वय झाले कि आपण निकम्मे.  काम करायला लायक नाही. मानसिक दृष्ट्या आपण विचार करतो कि आयुष्यभर खूप काम केले आता आराम करायची वेळ आहे.  माझ्या शास्त्रत्ज्ञ मित्राने सांगितले कि हे चुकीचे आहे. साठीनंतर आपल्यामध्ये Biologically  काहीच फरक पडत नाही.  (साठी बुद्धी नाठी ?).   त्याच्या दृष्टीने  ऐंशी पंच्यांशी नंतर  degeneration  ऑफ grey  cells  सुरु होते. व्यवस्थित व्यायाम करून निदान पंच्यांशी पर्यंत आपण   म्हातारे होऊ शकत नाही.  अर्थात जे मनानेच म्हातारे झाले त्यांचा नाईलाज.  अमेरिकेत व इतर युरोपिअन देशांमध्ये माणसे साठीनंतरही कार्यक्षम असतात व राहतात.  ते मनाने सदैव तरुण राहतात व आरोग्य सांभाळतात.  आपल्याकडेही माझ्या पाहण्यात काही व्यक्ती आहेत कि जे  ८५ व्या वर्षीही स्वतः कार चालवितात व  वैद्यकीय व्यवसाय करतात ( जसलोक  चे Dr वाडिया, ज्यांना धन्वंतरी पुरस्कार प्राप्त झाला आहे.)
VRS किंवा निवृत्ती घेतलेल्या लोकांनी स्वतःला occupied नाही ठेवले तर ते लवकर म्हातारे होतील.  त्यांनी काहीतर कमाई केली पहिले असे जरुरी नाही. पण व्यस्त (आणि मस्त) राहणे मात्र अत्यंत गरजेचे आहे.  राहून गेलेले छंद जोपासणे, वाचन, व्यायाम, लिखाण, संगीत, चित्रकला, इत्यादी गोष्टीत रममाण होणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे healthy attitude पाहिजे. सकारात्मक दृष्टी हवी. कंटाळा आला असे म्हणण्यापेक्षा स्वतःला गुंतवून ठेवा.  दुखणे, आजारपण व जबाबदाऱ्या असू शकतात. पण त्याचा जास्त बाऊ न करता हसत खेळत राहणे व आपल्यामुळे आनंद निर्माण करणे योग्य ठरेल.
जो पर्यंत खेळपट्टीवर उभा आहे तो पर्यंत विकेट  फेकायची नाही, धुवांधार batting करायची. एकदा  umpire  ने बोट वर केले कि मग बिनतक्रार निघून जायचे. हेच सचिनचे रहस्य जीवनातही लागू आहे. खरे आहे न ?

1 comment: