Thursday 30 March 2017

अभूतपूर्व भूतान

अभूतपूर्व भूतान  

     दि. १९-३-२०१७  वेळ:  ०७:४५ : मुंबई विमानतळावरून  उड्डाण घेतल्याक्षणापासून मनात भूतानच्या प्रवासाची चलचित्र फीत सुरू झाली. मनात उत्सुकता होती या देशाबद्दल, तेथील लोक, त्यांची संस्कृती , तेथील निसर्ग व इतर अनेक गोष्टींबद्दल, ज्या इतर देशांपेक्षा वेगळ्या आहेत.  मुंबई ते कोलकाता व तेथुन पुढे बागडोगरा असा जवळ जवळ २४०० कि मी  चा प्रवास मजेत पार पडला.  ईशा टूरचा फलक घेऊन आमचे स्वागत कारण्यास भूतानी ड्रायव्हर 'येशी ' हजर होता. अत्यंत हसतमुख , उमदा  व तरुण होता  येशी. स्वतःहून पुढे होऊन आमचे सामान ताब्यात घेऊन आम्हाला गाडीच्या दिशेने घेऊन गेला. सर्वप्रथम आमचे लंच बॉक्सेस आमच्या ताब्यात देऊन स्वतः सामान गाडीवर व्यवस्थित चढवायला निघून गेला. 
       भारतातील बागडोगरा ते भूतानमधील Phuentsholing (फुन्तशोलींग) हा प्रवास जेमतेम १५४ कि मी चा. मुक्काम फुन्तशोलींगमधे. भारतातील जयगाव व भूतानमधील फुन्तशोलींग खरं म्हणजे एकच शहर. पण  कमान ओलांडली कि जाणवतो  जमीन अस्मानाचा फरक. 
   
        
   असा फरक पाहिल्यावर अत्यंत लाज वाटली भारतातील अस्वच्छतेची. भूतानच्या स्वच्छतेचे व शिस्तप्रियतेचे कौतुक वाटले पण आपल्या  सीमेअलीकडील घाणीचे साम्राज्य बघुन अत्यंत वाईट वाटले. वाटले, प्रत्येक दोन किमी वर झळकणाऱ्या ममता दीदीला ओरडून सांगावे, "अग बाई, तुझे चार दोन पोस्टर कमी लागले तरी चालेल, पण कमीतकमी भारताच्या हद्दीतील बंगालमधील 'जयगाव ' तरी 'स्वच्छ' ठेव !"  १२५ करोड आबादीच्या भारताची, विदेशी प्रवाश्यांकडून इतकी मानहानी नको. थोडी तरी लाज बाळग. थोडा तरी धडा शिक, जेमतेम ८ लाख लोकसंख्येचा  चिमुकल्या भूतानकडून. अर्थात, धडा शिकायचा आहे आपण सगळ्यांनीच. मोदींच्या 'स्वच्छ भारत' या आव्हानाची,  नुसती घोषणा न राहता,  जनआंदोलनात  परिवर्तन  होण्याची अत्यंत तातडीची  गरज आहे.
        दुसरा महत्वाचा फरक जाणवतो तो म्हणजे आनंदी, हसतमुख व मृदु भाषी लोक. जसा आमचा ड्रायव्हर, तसेच इतर सर्व भूतानी लोकहि. देश गरीब आहे पण लोक रडत बसणारे किंवा भीक मागणारे नाही. गचाळपणा, अव्यवस्थितपणा  शोधूनही सापडणार नाही. (आपल्याकडे काय परिस्थिती आहे हे सांगण्याची काही गरज वाटत  नाही).  ग्रॉस नॅशनल हॅपिनेस (GNH ) ची संकल्पना मांडणारा व अंमलात आणणारा भूतान देश आहे, यात आश्चर्य नाही. वास्तविक परिस्थिती,  GNH Index ला दुजोरा देणारीच आहे, यात शंका नाही.
        पुरुषी लिंगाची लॉकेट्स, फ्रीझ मॅग्नेटस, मुक्तपणे दिसत होती. आमच्या गाईड किमीने तर विकेटच घेतली. लाकडी लिंग दाखवून विचारते हे काय आहे ? काहींनी निरागसपणे विचारले "What is that ?"  किमी म्हणते  " It's Lingam. We are little naughty, you know !"   कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. चेहऱ्यावर भाव असा , कि काय हा मेला चावटपणा ! काही लाज लज्जा आहे कि नाही ?
            भूतानी लोकांच्या स्वभावातील हा खोडकरपणा मला आवडला. दांभिकपणा अजिबात नाही.


          दुसऱ्या दिवशी ईमिग्रेशन करून, उत्तरेला १६० कि मी वर पारो शहराकडे निघालो. ७२०० फूट (२,२००मी.) उंचीवरील पारो म्हणजे निसर्गरम्य शहर.  भूतानमधील एकमेव विमानतळ पारोला आहे. येथे येणाऱ्या विमानांना ५५०० मी. उंचीची हिमालयाची शिखरे पार करून यावी लागतात. त्यामुळे जगातील अतिशय दुर्गम कमर्शिअल विमानतळ अशी त्याची ख्याती आहे.  परिणामी, अगदी मूठभरच ( फक्त '८' :  डिसेंबर २०१४ पर्यंत)  कमर्शिअल वैमानिक येथे विमान आणण्यास ऑथोराइज्ड आहेत. 
        ताक्तसंग  व्हॅली  ( टायगर्स नेस्ट मोनेस्टरी  ) ट्रेक :    समुद्रसपाटीपासून १०,००० फूट (३०४८ मी.) उंचीवरील टायगर्स नेस्ट मोनेस्टरी, ही भूतानमधील बौद्ध धर्माचे उगमस्थान मानले जाते. ८ व्या शतकात  गुरु रिम्पोचे (उर्फ  गुरु पद्मसंभव ) हे तिबेट मधून वाघावर स्वार होऊन 'उडत' या स्थळी आले. ( येथे वाघ म्हणजे त्यांच्याच दैवी रूपाचे वर्णन मानतात, ) त्यांनी  दानवांचा संहार करून या ठिकाणी ३ वर्ष ३ महिने ३ दिवस  ध्यान करून पुढे भूतानमध्ये बौद्ध धर्माची स्थापना केली. या गुंफेच्या आसपास मोनेस्टरी  १६९२ मध्ये बांधली. (पुढे आगीमुळे भस्मसात झाल्यावर रोपवेच्या  साहाय्याने  आज दिसणारी मोनेस्टरी नव्याने बांधली. मूळ सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी रोपवे काढून टाकला ). हि माहिती  आमच्या भूतानी गाईड चिमीने  दिली.
              व्हॅलीच्या तळापासून ( ७००० फूट / २१०० मी ) हाईक ला सुरवात होते.   काळ्या  कभीन्न पहाडावर छोटासा पांढरा ठिपका, म्हणजे मोनेस्टरी दिसू लागतो.  खालील पहाडाचा  फोटो नीट पहा. त्यात तूम्हाला एक विक्राळ चेहरा दिसेल. हा  चेहरा आहे  गुरु रिम्पोचे यांचा रुद्रावताराचा !
















  
     


 टायगर्स नेस्ट हि अत्यंत कठोर ट्रेक होती. मानसिक व शारीरिक अश्या दोन्ही क्षमतांची कठीण परीक्षाच होती.  पण ९०० मी उंची चढून शिखर गाठण्याचा आनंद केवळ अवर्णनीय.  हे म्हणजे, जवळ जवळ ३६० मजले चढून मग उतरण्यासारखे  अचाट काम झाले !  १०,००० फूट उंचीवरून दिसणारे दृष्य अतिशय विहंगम होते. वरील  'चेलेला पास' चे छायाचित्र त्याची साक्ष आहे.
          या ट्रेकमधे एक भूतानी मनुष्य प्रत्येकाला  अगत्याने  'नमस्ते' म्हणत होता. मग मोठयाने 'हॅलो ' म्हणाला. म्हणतो कसा,
    " मै कबसे नमस्ते बोल रहा हूँ तो कोई रिस्पॉन्ड  नही कर रहा. इसलिये 'हॅलो' बोल रहा हुं. हम भुतानी लोग हमेशा स्मायलींग, और तुम लोग मुह लटकाके".
     "ऐसा नही है. थक गये हैं इसलिये मुस्कान नहि दिख रही "..   माझा लंगडा युक्तिवाद.
   त्याच्या म्हणण्यात तथ्य नक्कीच होते.

              स्थानिक म्युझिअम,  डिझॉन्ग,  मोनेस्टरी , मेमोरियल चोरटेम (स्तुप ) भूतानी संस्कृतीची झलक देतात.   पुनाखा  हे शहर भूतानची जुनी राजधानी होती. तेथे जातांना दो चुला पास  (१०,२०० फूट ) वरून जावे लागते.  तेथे १०८ मेमोरियल  चोरटेम (स्तूप)  आशी दोरजी वांगमो वांगचुक (ज्येष्ठ राणी माँ ) यांनी बांधलेले आहेत.  पुनाखा खाली असल्याने थोडे गरम आहे,  म्हणून विंटर कॅपिटल.  पो चु  व मा चू  या दोन नद्यांच्या संगमावर आहे पुनाखा डिझॉन्ग.  आता शब्दात वर्णन करण्यापेक्षा फोटोंचा आस्वाद घ्या. मला खात्री आहे तुम्हालाही नक्कीच आवडेल हि फोटो यात्रा.
         


























        या भूतान प्रवासात त्यांची संस्कृती, लोक, निसर्ग सर्व पाहण्याची अनुभवण्याची संधी मिळाली. खुप काही शिकण्यासारखे आहे.  सर्वात महत्वाचे म्हणजे आहे त्या परिस्थितीत आनंदाने जीवन जगण्याची कला नक्कीच आत्मसात करायला हवी.  ईशा टूर्स व त्यांच्या सर्व प्रतिनिधींना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे, ह्या  अभूतपूर्व  भूतान दर्शनासाठी. धन्यवाद !

Sunday 12 February 2017

आमचा सरदार कट्टा

 आमचा सरदार कट्टा  :

'सरदार कट्टा' या नावाविषयी मी शेवटी सांगेन, पण प्रथम या कट्ट्याविषयी. 
स्थळ : सांता क्रुझ (पूर्व ) येथील पी अँड टी कॉलनीतील ए टाईप जवळील छोट्या मैदानालगतचा छोटा कट्टा. 
कालखंड : साधारणपणे  १९७२ ते  १९८२ दरम्यान. 
पात्रे :  अरुण भगुरकर , भाऊ राणे, हेमंत देव, विवेक मुळे, राजु बोरकर, परेश क्षीरसागर, सदा जाधव, शेखर कुलकर्णी,  व अस्मादिक (माधव महाशब्दे ). 
गेस्ट अपीयरन्स : अवी भगुरकर, मोहन देव, नितीन कर्णिक, श्रीनिवास  कलगुटकर, एजाज, स्टीफन  आणि इतर. 
       आम्हा सर्वांच्या आयुष्यात व जडण घडणीत  या कट्ट्याचे  खूप  मोठे योगदान आहे. रोज संध्याकाळी आम्ही या कट्ट्यावर  बसुन मनसोक्त गप्पा, फिरक्या, असा आमचा   नेहमीचा शिरस्ता असे. राजकारण, चालू घडामोडी , क्रिकेट,  सायन्स  ( भाऊ राणे हा शास्त्रज्ञ होता ), कॉमर्स, अशा विविध विषयांवर सखोल चर्चा आम्ही करत असू.  दुसरा हव्यास म्हणजे  हायकिंग व ट्रेकिंग.  शनिवार व रविवार हे आजूबाजूच्या डोंगरांवर भटकंती, अथवा दुर्ग भ्रमण, करण्यात घालवत असू.  तिसरा हव्यास ब्रिज खेळण्याचा.  एकदा का ब्रिजचा डाव सुरु झाला, कि खाण्यापिण्याची कोणालाही  काही शुद्ध नाही, रात्रभर व दुसऱ्याही दिवशी खेळ चालूच.  हे  जरी सर्वसामान्य  वाटत असले, तरी  या ग्रुपमध्ये एक वेगळेपणा होता.  आमच्या अचाटपणाचे काही किस्से मी सांगणार आहे.  
       आम्हा सर्वांनाच वाचनाची खूप आवड.  त्यावेळी आम्ही काही मासिके उदा. इलस्ट्रेटेड विकली, सायन्स टुडे, स्पोर्टस वीक, इंडिया टुडे , रीडर्स डायजेस्ट , कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू , इत्यादी  (यात फिल्म फेयर किंवा तत्सम मासिके नव्हती ), नियमीतपणे घेत असू व ती वाचून त्यावर आपल्याला आवडलेल्या लेखावर चर्चा (कधी कधी अगदी हमरीतुमरीवर येऊन) करत असु. एकदा  सगळ्यांची वाचून झाली कि प्रत्येक सदस्य आपापल्या आवडीचे मासिक स्वतःच्या  संग्रही ठेवत असे.  मला  आर्थर हॅले ची सर्व पुस्तके वाचण्याची आवड याच कट्ट्याने निर्माण केली. 
        एकदा आम्ही घाटकोपरच्या डोंगरावर  ट्रेकिंगसाठी,  रस्ता  शोधत गेलो. वरून पवई तलाव  व IIT बाजूचे दृष्य बघून थक्क झालो. (लक्षात घ्या , त्यावेळी  मोबाईल , गुगल मॅप्स , काहीच नव्हते ).  धाडसीपणा हा गुण तर होताच, पण भाऊकडे कोणाशीही मैत्री करण्याचीहि कला होती. त्याने त्या डोगरावरील एका मजुराला थांबवले. मजूर घाबरलाच.  भाऊने त्याला नाव विचारले. शटप्पा  हे नाव कळल्यावर  त्याला विनंती केली कि त्याच्या डोक्यावर घमेल्याच्या खाली असलेल्या रुमालाचे  गोल वेटोळे मला शिकव. शटप्पाचा विश्वासच बसेना. मग तीनवेळा त्याने घडी करुन दाखवली तेंव्हा भाऊरायांना कळले. काय आनंद, नवीन तंत्र आत्मसात  केल्याचा!  त्याला धन्यवाद करून  IIT च्या बाजूने आम्ही डोंगर उतरून  परतलो.  एक कोजागिरी आम्ही याच डोंगरावर घालवली. (किती  डास  चावले ते विचारू नका !)
       कर्नाळा किल्यावरील चढाई, कळसुबाई शिखरावरील चढाई, किल्ले रायगडावरील चढाई ( रोप वे  नसताना),  भंडारदरा , रतनगड, राजगड, विसापुर किल्ला,  महाबळेश्वर - प्रतापगड स्कुटर राईड, अशा अनेक चित्तथरारक ट्रेक्स या ग्रुपबरोबर केल्या आहेत. या प्रत्येक मोहिमेत सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. विसापूरचा अनुभव असा, कि लोहगडला जाण्यासाठी आम्ही मळवली स्टेशनला अपरात्री उतरलो, तेंव्हा स्टेशन आहे कि सिग्नलला गाडी उभी आहे हे कळेना , त्यात गर्दीमुळे  आधीच ग्रुपची  फाटाफूट  झालेली. सगळेजण चढले का ? त्यात जे चढलेत ते मळवळीला उतरलेत का ? इतके प्रश्न.   मी व शेखर फक्त बरोबर होतो. गर्दीमुळे प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूने ट्रॅकवर उतरावे लागले.  काळोखात ट्रेनच्या बाजूने चालताना एक ओळखीची शीळ मी देत होतो. त्याचा परिणाम असा झाला तीच शीळ मला वेगवेगळ्या डब्यातून ऐकावयास मिळाली.  झाले ! सगळे मित्रमंडळी परत एकत्र झाल्याचा आनंद अवर्णनीय!  पुढे दुसरा गोंधळ.  काळोखात  लोहगडसाठी निघालो,  कोणाला तरी रस्ता विचारावा तर अवेळी  कोणीच भेटेना. तेवढ्यात  शेतात कोणी तरी दिसल्याने त्यांना रस्ता विचारला. एक क्षण काळजाचा ठोकाच चुकला, कारण  ज्याला विचारत होतो, ते होते बुजगावणे !. नंतर  पुढे  रस्ता चुकल्याने पोहोचलो विसापूरच्या किल्ल्यात !
        एकदा आम्ही  संध्याकाळी अचानक भंडारदऱ्याला जाण्याचा निर्णय घेऊन लगेच रात्रीच्या पॅसेंजरने आम्ही १२ जण निघालो सुद्धा. अपरात्री इगतपुरीला गेल्यावर कळले तीन दिवस अतिवृष्टीमुळे ST बसेस येतच नाही  आहेत. सकाळी बस आली तर ठीक नाहीतर वापसी.  नशिबाने बस आली व  अनिश्चिततेत  प्रवास सुरु झाला.  त्यातच एक दिवस कळसुबाई गाठायचं ठरलं.  नगर रस्त्यावर शेंडी नावाच्या छोटया गावी उतरलो व हळू  हळू  ५४०० फूट  उंचीवरील  महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर "कळसुबाई" च्या दिशेने चढाई सुरु केली. अर्ध्या रस्त्यात आमचा पाण्याचा साठा संपला.  एका ठिकाणी पाण्याचा साठा  दिसला पण प्यावे कि न प्यावे  कळेना.  एका गुराख्याला विचारले कि यातील पाणी पिण्याचे आहे का, तर तो म्हणतो कसा, " हो हो, आमची गुरं ढोरं बी पित्यात. त्यात काय ! "  सत्यानाश.  आमच्यातील  मी व अजून ५ जणांनी  पुढची चढाई चालूच ठेवली. एका छोट्या विहिरीतून मोठ्या प्रयासाने, वेलींचा दोर करुन, प्लास्टिक बॅगेत  दगड भरून कसेतरी पाणी मिळवले व  आमच्या तृषार्त मित्रांना  पाणी पाजून तृप्त केले.  शेवटच्या मोठ्या खडकावरील चढाई एका भक्कम साखळदंडाच्या साहाय्याने केली (हल्ली मजबूत शिडया ठोकल्या आहेत). हा कसोटीचा क्षण होता. खाली पाहण्याची हिम्मत होत नव्हती.  शिखरावर एक छोटे मंदिर आहे.  जसा  दरवाजा उघडला, तसे तोंडावर फड फड करत कबुतरे आली.  कुबट वासात दर्शन करून बाहेर आलो.  कळसुबाई सर केल्याचा आनंद निश्चितच अवर्णनीय ! त्यानंतर होडीने अमृतेश्वर मंदिर, रतनगड,  नंतर रंध्र धबधबा  व भंडारदरा धरण, असा प्रवास झाला.   
        एक असाच अचाट उपक्रम म्हणजे सांता क्रुझ ते तानसा तलाव, असा जाऊन येऊन जवळ जवळ २२० कि.  मी.  सायकल प्रवास. एकाच दिवसात. आम्ही ६ जण होतो. एकट्या विवेककडे स्वतःची (डायनामो वाली ) सायकल. बाकी सर्वांच्या भाड्याच्या सायकली.  किती हा अतिरेकीपणा, आज कल्पनाही करवत नाही.  
     त्या नंतर अत्यंत साहसी असा बद्रीनाथ, Valley of  Flowers,  हेमकूठं साहेब (१५,२१० ft), वसुधारा धबधबा, असा प्रवास मोजक्या मित्रांबरोबर झाला. 
        असे कितीतरी प्रसंग आहेत. सगळे सांगणे शक्य नाही, म्हणून निवडक प्रसंग सांगितले. 
       हे सर्व विस्ताराने सांगण्याचे  प्रयोजन म्हणजे, तरुण वयात या  सर्व मित्र मंडळींमुळे स्वतःमध्ये योग्य गुण जोपासले गेले. साहसी वृत्ती, लोकांमध्ये सहजतेने मिसळण्याची सवय, व छोट्या गोष्टीतही आनंद घेण्याची वृत्ती, वगैरे. याचा  प्रभाव  पुढील आयुष्यावर व खास करून व्यवसायात  निश्चित दिसतो. हे सर्व या सरदार कट्ट्यामुळे शक्य झाले. सरदार कट्ट्याचा, व त्या सर्व मित्रांचा, मी शतशः ऋणी आहे. आज भाऊ राणे या जगात नसूनही  अनेक प्रसंगी त्याची आठवण सतत  येत असते.  काही दिवसांपूर्वी मी, मुलांनी आग्रह केल्याने त्यांना घेऊन त्या ऐतिहासिक सरदार कट्ट्यावर बसून आलो. मनात ४५ वर्षा पूर्वीच्या  आठवणी जाग्या झाल्या. परत इतिहासात जाण्याची इच्छा झाली. पण नको. मी तृप्त व समाधानी आहे, आता मुलांना त्यांचा इतिहास घडवू देत.                 
       आता कट्ट्याच्या  नावाबद्दल.  इतका  सर्फिंर्यांचा अचाटपणा  बघूनही तुम्हाला 'सरदार' या नावाबद्दल प्रश्न आहेच का ?