Tuesday 14 January 2014

"अरेच्या !"

"अरेच्या !"

सर्व प्रथम  मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.  तिळगुळ घ्या व गोड गोड बोला.

"अरेच्या "  हे टायटल बघून अजिबात भाम्बावून जाऊ नका.  डोक शांत ठेवण्याची  हि कल्पना माझी नाही. मला आवडली म्हणून हा blogg प्रपंच.

एकदा अद्वैत बरोबर कारने चिंचोळ्या रस्त्याने जात असता अचानक समोर एक रिक्षा आडवी आली. रस्त्याच्या मधोमध उभी करून त्यातून प्रवासी उतरू लागले. आपण चुकीच्या ठिकाणी पार्क केल्याने लोकांना त्रास होतो आहे याची थोडीही जाणीव त्याला नव्हती. ' त्यात काय ?' अशी मग्रुरी दिसत होती. मला अचानक ब्रेक लावावा लागल्याने चिडून काही बोलणार , तेवढयात अद्वैत मला थांबवीत म्हणाला "अरेच्या ".  मला उद्देशून तो म्हणाला जाऊ दया हो बाबा आपण कशाला रक्त तापवून घ्यायचं. सोडून दया.

अंतर्मुख होऊन विचार केला गाडी चालवितांना असे प्रसंग अनेकदा येतात. प्रत्येक वेळी आपण react झालो तर कायमचा रक्त दाब ओढवून घेऊ. त्यापेक्षा नुसते " अरेच्या " म्हणा आणि सोडून दया, काय फरक पडतो तो बघा.  भले खोटे खोटे का असेना ही प्रतिक्रिया,  पण "अरेच्या " मुळे डोके शांत राहते हे खरे.

 दर वेळेला  हे "अरेच्या " कामाचे नाही.  तरीही  बऱ्याच वेळेला आपण overreact करतो. निदान तेंव्हा तरी "अरेच्या" चा उतारा  छान काम करतो.

नुसते ड्रायव्हिंग करतानाच नव्हे तर इतर वेळीही आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात. वादावादी, तंटे, झटापटी , या सर्वांचा एक परिणाम निश्चित असतो, BP.  पेपर वाचल्यावर सुद्धा डोकं तापून तावातावात वाद घालतो आपण.  कधी कधी अतिशय क्षुल्लक प्रसंगामुळे आपण क्लेश करून घेतो काही कारण नसताना.  नंतर पश्चाताप करण्यापेक्षा नुसते "अरेच्या " म्हणा आणि सुटा.

हे फार अवास्तव वाटू शकते.  कधी प्रसंग असा असतो की आपण "अरेच्या " वर सोडू शकत नाही. योग्य प्रतिक्रिया व्हायलाच पाहिजे. पण असे अपवादात्मक प्रसंग कमी असतात. कधी react करायचे व कधी "अरेच्या" म्हणायचे,  हे तारतम्य आपल्याला असायलाच हवे.  

मला या गोष्टीचा इतका छान अनुभव येऊ लागला कि मी वारंवार व वेगवेगळ्या प्रसंगी हे अस्त्र वापरू लागलो.  आता अद्वैत मला म्हणतो " बाबा, अतिरेक करू नका ; मी केवळ गम्मत म्हणून बोललो होतो. "

गमतीगमतीत का होईना, पण किती महत्वाचा मंत्र अद्वैत ने दिला.
 तुम्हीही वापरून बघा आणि स्वतःच अनुभव घ्या .

"  अरेच्या  "


No comments:

Post a Comment