Sunday 29 January 2012

" सारे रोजचे तरीही, नवा प्रकाश प्रकाश .... फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश "

नवी मुंबई, दि.२७ जानेवारी २०१२ :



आयुष्य इतक्या वेगात सरकते आहे कि सरकणाऱ्या क्षणांचा  पुरता  आस्वाद घेण्याच्या आतच पुढचा क्षण समोर उभा राहतो. नवीन वर्ष २०१२ ची सुरवात होत नाही तो पहिला महिना संपत पण आला. आयुष्याला pause चे बटन असते  तर, काय मजा आली असती नाही ? आपण सुखात असलो कि वेळ भराभर जातो; कठीण परिस्थिती असली कि वेळ जाता जात नाही.  हा तर सर्वांचा अनुभव आहे. 

वर्ष २०१२ ची सुरवात नव चंडी हवनाने  व्हावी यापेक्षा छान काहीच नाही. अद्वैत महिनाभर येथे आल्यामुळे वेळ अतिशय मजेत गेला. भरपूर फिरणं झालं.  नाटक,  सिनेमा, आप्तेष्ठांकडे  दौरे  झाले.  देवदर्शनपण मनासारखे झाले, शॉपिंग, हॉटेल.  " जिंदगी ना मिलेगी दोबारा " असा प्रकार चालू होता. आता अद्वैत अमेरिकेला रवाना झाला व परत नेहमीचे आयुष्य सुरु झाले.  

सहज मनात विचार आला, हा टप्पा कायमचा का होऊ शकत नाही ?  कोणीतरी   pause  बटन दाबून  ठेवावे असे वाटले. कसे शक्य आहे ते ?  साधे आठवडाभर काम करताना रविवारची आपण आतुरतेने वाट पाहतो.  खर तर  रविवार enjoyable होण्याचे रहस्य आठवडाभर केलेल्या कामात आहे.  थोडे जास्त काम पडले कि आपण सुट्टीची कशी नितांत गरज आहे याचे समर्थन करतो.  जरा आपल्या हृदयाकडे पहा. जन्माला आल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत  अथक परिश्रम करते ते . " मला आता ब्रेक पाहिजे ", असे कधी म्हणते का ते  ?  विश्रांती न घेता ते कसे काय इतके काम करू शकते ? आपल्या गाडीलासुद्धा servicing ची मधून मधून गरज पडते. हृदयाचे servicing  कोण व केंव्हा करते ? आपला 'जिवंतपणा'  ज्यावर अवलंबून आहे असे विस्मयकारक मशीन आहे हृदय. आहे न विचार करण्यासारखी गोष्ट ?  एक धडा आपण शिकलाच पाहिजे यातून. काम करता करताच विश्रांती घेण्याची. हृदयासारखी. काम आणि विश्रांती एकाचवेळी शक्य आहे का ? का नाही ? अहो विश्रांती म्हणजे केवळ डोक्यावरून पांघरुण ओढून पलंगावर पडून राहणे का ? मित्रांशी गप्पा मारणे, चक्कर मारून येणे, गाणे ऐकणे, नुसते बाल्कनीत उभे राहणे, इत्यादी. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद आहे व पर्यायाने विश्रांतीही.  शिवाय change of work is rest .  तर आता हृदयाच्या अफाट कार्यक्षमतेचे रहस्य आपल्या रोजच्या आयुष्यात वापरायला काही हरकत नाही . 

आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा  जर ठरवले, तर हा गतिमान सुखाचा टप्पा एका अर्थी कायमचा असू शकतो. म्हणजे असे कि, रोज गोड धोड खाऊनही कंटाळा येतो  व रुची पालट होण्यासाठी वेगळी चव पाहिजे असते, तसेच कठीण प्रसंग  उलट लज्जत वाढविणार.  आपला दृष्टीकोन बदलावा लागेल.  जेंव्हा  परिस्थिती नियंत्रणाबाहेर असेल,  त्यावेळी आलेल्या  भल्या  बुऱ्या  प्रसंगावर आपली प्रतिक्रिया  आपण  जाणीवपूर्वक  ठरवायची,  आजूबाजूच्या लोकांनी किंवा परिस्थितीने नाही. सगळे रडतात म्हणून मी ही रडायचे, याला काय अर्थ आहे ?  छोट्यांच्या  शाळेत असे दृश्य दिसते.  त्यापेक्षा  " अरे  वा ! छान....!"  असे म्हटल्याने सकारात्मक उर्जा अंगी निर्माण होते.  त्यावेळी  "Wow ! " म्हणा,  आणि बघा कसा बदल होतो ते ! 

           " सारे रोजचे तरीही...नवा प्रकाश प्रकाश .... फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश "

No comments:

Post a Comment